गुरु पौर्णिमेनिमित्त एस.पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून त्रिशुंड गणपती मंदिरात सायबर जनजागृती अभियान

वाघोली : गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने एस.पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्विक हील फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने सोमवर पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिरात विशेष सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविले.
गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादावर आधारित विशेष नाट्य सादर केले. या सादरीकरणातून श्रीकृष्णाच्या शिकवणीला आधुनिक काळातील सायबर सुरक्षेशी जोडत ‘सायबर गीता’च्या माध्यमातून नागरिकांना सायबर सुरक्षेचा संदेश देण्यात आला.
यावेळी एस.पी. कॉलेजच्या सायबर वॉरियर्सनी उपस्थित नागरिक आणि भाविकांना ‘सायबर गीता’चे वाटप करून ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, सायबर गुन्हे आणि इतर डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांनी डिजिटल जगात सतर्क आणि जबाबदार राहण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि समाजाला सायबर सुरक्षित बनविण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले.
गुरु पौर्णिमेच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासोबत आधुनिक काळातील सायबर सुरक्षेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.










